मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा मुंबईमध्ये आयोजित केला होता . यावेळी त्यांनी त्यांच्या सडेतोड संवाद शैलीतून अनेक विषयांवर भाष्य केले आहे . दोन महिन्यांपासून राज ठाकरे हे प्रकृती अस्वस्थामुळे विश्रांती घेत होते . त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक केले आहे.
२ महिन्यानंतर राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी एक जुनी आठवण देखील सांगितली . जेव्हा त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता . ते म्हणाले कि , “मला आजही ती गोष्ट आठवतेय की जेव्हा बाळासाहेबांना कळलं, की हा काय राहत नाही पक्षात आता. माझी शेवटची भेट होती. मी आजपर्यंत तुम्हाला कधी ही गोष्ट बोललो नाही. निघताना माझ्यासोबत मनोहर जोशी होते. ते रुमच्या बाहेर गेले. ते बाहेर गेल्यावर बाळासाहेबांनी मला बोलावलं. असे हात पसरले माझ्यासमोर, मला मिठी मारली आणि म्हणाले आता जा. त्यांना समजलं होतं. त्याच्यामुळे मी दगाफटका करून, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून बाहेर नाही गेलो. बाहेर पडून दुसऱ्या कुठच्याही पक्षात नाही गेलो, तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला”, असं राज ठाकरे म्हणाले.
नुपूर शर्मा यांनी केलेल्या विधानावरुन त्यांना सबंध जगभरातील मुस्लिम बांधवांची माफी मागावी लागली होती. एवढेच नाही तर त्यांच्या विरोधात एक आंदोलनच पेटले होते.त्यामुळे भाजपच्या प्रवक्ते पदावरुनही त्यांना पायउतार व्हावे लागले होते. त्या जे काही बोलल्या होत्या त्या झाकीर नाईकच्या मुलाखतीमधलेच होते. त्यांनी बोललेले एवढे लागले मग ओवैसी आमच्या देवतांना मनहूस म्हणतात त्यांच्यावर का कारवाई किंवा माफी मागण्याची वेळ येत नाही असा सवाल राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे .
प्रभाग रचनेवरुन सुरु असणाऱ्या गोंधवल देखील राज ठाकरे यांनी रोष व्यक्त केला आहे . लोक काय गुलाम आहेत का. त्यांना नगरसेवकही माहीत नसतं. चार चार माणसांचा प्रभाग करताय. तो भाग कोणी बघायचा. कुणाला कळत नाही. कुठे जावं. कारण लोक जाब विचारत नाही. एकदा लोकांनी ठरवलं पाहिजे. सरकारने हा नुसता खेळ मांडला आहे. लोकांना गृहित धरण्यात येत असल्याचे ते म्हणाले. चार चार नगरसेवकांचा प्रभाग हवाच कशाला ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे .
” निवडणुकांच्या दरम्यान केलेले काम जनतेसमोर घेऊन जाणे गरजेचे आहे. अॅडजेस्टमेंट करून निवडणुका लढवू नका. त्यामुळे पक्षाचे आणि स्वत:चे राजकीय करिअरही धोक्यात येते. सध्या निर्माण झालेल्या राजकीय स्थितीचा फायदा घ्या. आगामी काळात येणारी प्रत्येक निवडणुक ही ताकदीने लढा, पक्षही तुम्हाला काही कमी पडू देणार नाही ” असे आश्वासन राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे.