कणकवली- भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयातील अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला असून त्यांनी कणकवली न्यायालयासमोर शरणागती पत्करली आहे. राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी ही माहिती दिली. आता नितेश राणे यांच्यासाठी कोठडीची मागणी करणार असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटले आहे.
संतोष परब हल्ल्या प्रकरणी नितेश राणेंना अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु होते. मात्र राणे यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयानं नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. नितेश राणे यांना अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण मिळालं होतं. तसेच, नियमित जामीनासाठी राणे यांनी सत्र न्यायालयात अर्ज करावा असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यानंतर नितेश राणे यांनी सिधुदुर्ग कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु, सिंधुदुर्ग हायकोर्टानंही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर पुन्हा एकदा नितेश राणे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. परंतु, अखेर आता त्यांनी जामीन अर्ज मागे घेतला असून ते सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात शरण जात आहेत.
काय आहे प्रकरण ?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भोवर्यात अडकले. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते.
दरम्यान, नितेश राणे म्हणाले की, “कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवून मी कोर्टासमोर शरण यायला जातोय. आजपर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने बेकायदेशीररित्या मला अटक करण्याचा प्रयत्न केला, अशी छोटीशी मात्र सूचक प्रतिक्रिया शरण येण्यापूर्वीच नितेश राणे यांनी माध्यमांना बोलताना दिली आहे.
नितेश राणे यांचे सूचक ट्विट
या ट्विटमध्ये गृहमंत्री अमित शहा आणि माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांचे फोटो वापरून समय बलवान है… असं म्हणत नितेश राणे यांनी एक सूचक ट्विट केले आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/1488804496595898373