मुंबई- राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दांपत्याच्या जामिन याचिकेवर उद्या दुपारी पावणे तीन वाजता सुनावणी होणार आहे.
खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यातील वातावरण चाललेच पेटून निघाले.
पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केली. नवनीत राणा यांच्याविरोधात खोटं जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच, मुलुंड पोलीस स्थानकातही गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.
त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं गेलं. न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्यांच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी नामंजूर करत 29 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.
व्यस्त कामकाजामुळे मुंबई सत्र न्यायालयाच्या वतीनं मागील सुनावणीतच स्पष्ट करण्यात आलं होतं की, शक्य झाल्यासच आम्ही शुक्रवारी ही सुनावणी घेऊ. त्यानुसार, आज याचिकाकर्त्या राणा दाम्पत्याच्या वकिलांनी युक्तीवाद केला. त्यानंतर उद्या दुपारी पावणेतीन वाजता ही सुनावणी घेण्याचं मुंबई सत्र न्यायालयानं निश्चित केलं आहे. सध्या राणा दाम्पत्य कारागृहात असून खासदार नवनीत राणा भायखळा कारागृहात आहेत, तर आमदार रवी राणा तळोजा कारागृहात आहेत.