चंदीगड – पंजाबचे माजी मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. नवज्योतसिंग सिद्धू यांनी पटियाला कोर्टात शरणागती पत्करल्यानंतर त्यांची रवानगी पटियाला तुरुंगात करण्यात आली.
सिद्धू यांना पटियाला तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. त्यांना 241383 हा क्रमांक देण्यात आला आहे. याशिवाय सिद्धू यांना तुरुंगात एक खुर्ची , टेबल , दोन पगडी , एक अलमारी , एक कांबळ , एक बेड , तीन अंडरवियर आणि बनियान , दोन टॉवल , एक मच्छरदानी , एक पेन , दोन बुटांची जोडी , दोन बेडशी , चार कुर्ता पायजमा आदी वस्तू देण्यात आल्या आहेत. अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सिद्धू यांना शरणागती पत्करण्यासाठी कमीत कमी एक आठवड्याची सवलत देण्याची विनंती सिद्धू यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला केली होती . मात्र , या प्रकरणावर तात्काळ सुनावणी करण्यास कोटनि नकार दिला. त्यामुळे सिद्धू यांना तुरुंगात जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
काय आहे प्रकरण ?
27 डिसेंबर 1988 च्या संध्याकाळी सिद्धू हे त्यांचे मित्र रुपिंदर सिंग संधूसोबत पटियालाच्या शेरावले गेटच्या बाजारात पोहोचले होते. हे ठिकाण त्यांच्या घरापासून 1.5 किमी अंतरावर आहे. तेव्हा सिद्धू क्रिकेटपटू होता. त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू होऊन फक्त एक वर्ष झाले होते. त्याच मार्केटमध्ये कार पार्किंगवरून 65 वर्षीय गुरनाम सिंग यांच्याशी त्यांचा वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. सिद्धू यांनी गुरनाम सिंगला पाडले. त्यानंतर गुरनाम सिंग यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. गुरनाम सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते.
त्याच दिवशी सिद्धू आणि त्यांचा मित्र रुपिंदर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सत्र न्यायालयात खटला चालला. वर्ष 1999 मध्ये सत्र न्यायालयाने हा खटला फेटाळून लावला. वर्ष 2002 मध्ये पंजाब सरकारने सिद्धूविरोधात उच्च न्यायालयात अपील केले होते. दरम्यान 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर अमृतसर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले होते.
उच्च न्यायालयाने डिसेंबर 2006 मध्ये निकाल सुनावला. यामध्ये उच्च न्यायालयाने सिद्धू आणि संधूला दोषी ठरवून तीन वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. सिद्धू यांनी त्यानंतर लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांनी सिद्धूच्यावतीने खटला लढवला होता. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. सन 2007 मध्ये सिद्धू पुन्हा अमृतसरमधून निवडणूक जिंकले.
त्यानंतर मृताच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. त्याचा आज निकाल लागून सिद्धू यांना एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.