मुंबई- कथित फोन टॅपिंग प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आज चौकशी झाली. त्यामध्ये नाना पटोले यांनी सांगितले की राजकीय द्वेषापोटी आपला फोन रेकॉर्ड करण्यात आला असून, अधिकाऱ्यांनी फोन टॅप केलेला जो आवाज मला ऐकवला तो माझाच होता असा दावा त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रक्रियेनंतर नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची माहिती दिली.
पोलिसांनी या प्रकरणी नाना पटोले यांचा जबाब नोंदवला. अधिकाऱ्यांनी फोन टॅप केलेला जो आवाज आपल्याला ऐकवला तो आपलाच होता, हे नाना पटोले यांनी मान्य केले. त्याचबरोबर कोर्टाच्या चार्जशीटमध्ये देखील याची नोंद येणार असल्याचं देखील नाना पटोले यांनी सांगितले आहे.
ड्रग्जच्या धंदा करणारा अमजद खान असं नाव देऊन माझ्या कॉलचं रेकॉर्डिंग करण्यात आल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. भाजपने पदाचा दुरुपयोग करुन हा व्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेला घाला आहे. मी अमजद खान, तर आताचे जय-विरु हे राजकीय खलनायक आहेत. पण आता तपासातून रश्मी शुक्ला यांचा बोलविता धनी समोर येणार असल्याचं देखील पटोले यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर राजकीय द्वेषापोटी माझा फोन रेकॉर्ड करण्यात आला. कोर्टात चार्जशीटमध्ये याची नोंद येणार असल्याचं देखील पटोले यांनी म्हटलं आहे. तसेच डीसीपी रँकच्या अधिकाऱ्यांनी माझा जबाब नोंदवला आहे. माझं फोन रेकॉर्डिंग त्यांनी ऐकवलं. तो आवाज माझाच होता हे मी कबूल केलं असून, शेतकरी आंदोलन विषयक माझी भूमिका या फोन्स कॉलमध्ये होती. माझा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीच्या धोरणाला विरोध यात स्पष्ट होत होता असंही पटोले यांनी म्हटलं आहे.