मुंबई- फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्यांदाच कुणा-कुणाचे फोन टॅप झाले होते, याचा गौप्यस्फोट केला आहे.
याबाबत बोलताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, “रश्मी शुक्ला यांनी काही फोन टॅप करून त्याचा राजकीय कामासाठी वापर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विधानसभेतही आवाज उठवण्यात आला होता. शिवाय त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांनी चुकीच्या पद्धतीनं फोन टॅप केले होते, हे अहवालातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच त्यांच्यावर करवाई करण्यात आली आहे”
‘रश्मी शुक्ला पुण्याच्या आयुक्त असताना काही राजकीय लोकांचे फोन टॅप केले होते. रश्मी शुक्ला यांनी योग्य ती प्रक्रिया न फॉलो करता फोन टॅपिंग केलं होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे यांचे फोन टॅप करण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती पाटील यांनी दिली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अमजद खान नावाने तर बच्चू कडू- निजामुद्दीन बाबू शेख या नावाने फोन टॅप करण्यात आल्याचे वळसेंनी सांगितलं.
रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत आरोप केले होते. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉ. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सध्या त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे कार्यरत आहेत.