रायगड : खासदार उदयनराजे भोसले यांचा निर्धार शिवसन्मानाचा कार्यक्रम रायगडावर सुरू आहे. यावेळी शिवप्रेमींशी बोलत असताना त्यांनी भाजप आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर रोष व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, भीती वाटते, खंत वाटते, वेदना होतात, किती स्वार्थी आणि व्यक्ती केंद्रित लोक झाले आहेत. लोकांमध्ये विधिष्ठ जरी आलं तरी चालेल, पण माझा स्वार्थ साधला गेला पाहिजे. मी सत्तेत आलो पाहिजे हा विचार महाराजांनी केला नव्हता त्यांनी रयतेचा विचार केला होता. तुमचा आमचा विचार केला होता. केवळ शिवाजी महाराजच नाही तर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंची खिल्ली उडवावी असा अवमान राज्यपालांनी केला आहे.
यावेळी उदयनराजेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावर त्यांचा चांगला समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, या लोकांना महाराजांचा अपमान करणं अंगवळणी पडलं आहे. अशा विकृतांच फावलं आहे. एक बोलला म्हणून दुसरा बोलतो कोण राज्यपाल त्याचं नाव घ्यायचं नाही ते कधी मोठे नव्हतेच राज्यपाल पद हे सर्वात मोठं आहे ते सन्मानाचं पद आहे. महाराजांचा अवमान हा आपला अवमान वाटत नाही का? आपण काही करणार आहोत की नाही या राजकारण्याच्या किती दिवस तावडीत राहणार… आज हा देश विकृत लोकांच्या तावडीत गेला हे सांगताना खंद वाटते अशी व्यथा देखील उदयनराजे यांनी व्यक्त केली आहे.