पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारल्याने (Monsoon Update) शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.पावसाभावी पीकं सुकून चालले आहेत. मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान विभागाकडून आता पावसाबाबत नवा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागनं पुढील 24 तासांसाठी पुणे शहरात येलो अलर्ट जारी केला आहे.
काय आहे नवा अंदाज?
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुणे शहरात पुढील 24 तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुण्यासह सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अकरा जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यावर दुष्काळाचं संकट
यंदा बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात मान्सून उशिरानं दाखल झाला. त्यामुळे पेरणीला उशिर झाला. त्यातच जुलैमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. बळीराजावर दुबार पेरणीचं संकट ओढावलं. यातून शेतकरी सावरत असतानाच ऑगस्ट महिना पूर्ण कोरड गेला. ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस न पडल्यानं खरीप हंगाम संकटात सापडला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.