नवी दिल्ली- समस्त देशवासियांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. यंदा देशात 10 दिवस आधीच मान्सून दाखल होणार आहे. मान्सून 20 किंवा 21 मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यानंतर तो पुढील काही दिवसात देशाच्या उर्वरित भागात बरसणार असल्याचा अंदाज ‘युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर पह्रकास्ट’ या संस्थेने वर्तवला आहे.
सध्या देशात उन्हाचा चटका वाढला आहे. दिवसेंदिवस तापमानात देखील वाढ होत आहे. पाण्याची टंचाई देखील भासत आहे. त्यामुळे पाऊस लवकर सुरु झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना आणि नागरिकांना फायदा होऊ शकतो.
दरम्यान, दरवर्षी मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये दाखल होतो. यंदा दहा दिवस आधीच मान्सूनची बरसात सुरु होणार आहे. बंगालच्या उपसागरात झालेल्या हवामान बदलानुसार सध्या अरबी समुद्रात अँटी-सायक्लोन क्षेत्र तयार होत असल्याचे संकेत मिळतात. त्यामुळे मान्सून केरळमध्ये लवकर पोहचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने 14 एप्रिलला जाहीर केला होता. यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडणार आहे. हा पहिला अंदाज आहे. एकूण पावसाच्या 74 टक्के पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीत पडत असतो. फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर सर्वच नागरिकांसाठी महत्त्वाचा मानला जातो. पाऊसमान चांगला होण्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना नागरिकांना दिलासा मिळाला आहे.