महाराष्ट्र : राज्यात मेंडोस चक्रीवादळाचा परिणाम कमी झाला आहे. पण तरीही राज्यातील वातावरण मात्र कुठे ढगाळ,कुठे पाऊस कुठे, तर कुठे थंडी असेच राहणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढली आहे. तर हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद मध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे.
गुरुवारी काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण सटाणा मालेगाव देवळा, सिन्नर नाशिक शहरांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका परिसरात देखील पावसाने हजेरी लावली आहे. त्यासह औरंगाबाद ,चित्ते पिंपळगाव ,निपाणी आडगाव ,भालगाव ,पाचोड या परिसरामध्ये देखील चांगला पाऊस झाला आहे.
पूर्व मध्य बंगालच्या अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढवून वादळी प्रणालीची निर्मिती झाली आहे. लक्षदीपच्या अमनदीवी पासून 620 किलोमीटर पणजी पासून 670 किलोमीटर पश्चिमेकडे असलेली वादळी प्रणाली भारताच्या किनाऱ्यापासून दूर पश्चिमेकडे सरकते आहे. त्यामुळे या प्रणालीची तीव्रता हळूहळू ओसरते आहे. तर आग्नेय बंगालच्या उपसागरातून विश्ववृत्ताजवळ कमी दाबक्षेत्राची निर्मिती झाली आहे या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत.