नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षातील दाखल सर्व याचिकांवर येत्या 13 जानेवारीला एकत्रित सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज ही माहिती दिली. महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे स्थापन झालेल्या ईडी सरकारच्या वैधतेला शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यासह बंडखोर आमदारांची अपात्रता आणि सत्ता संघर्षावेळी निर्माण झालेल्या वादंगावर दाखल सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली घटना पिठापुढे सुनावणी सुरू असून सरन्यायाधीशांनी पुढील सुनावणीसाठी पुढच्या वर्षी अर्थात 13 जानेवारीला तारीख दिली आहे.
घटना पिठातील एक न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांची तब्येत बिघडल्याने 29 नोव्हेंबर रोजी होणारी सुनावणी होऊ शकली नाही. तसेच पुढील आठवडा कामकाजाच्या दृष्टीने व्यस्ततेचा असल्याकारणाने घटना पिठापुढे सुनावणी घेणे शक्य नसल्याचे कारण देऊन सरन्यायाधीशांनी या सर्व दाखल याचिकांवर 13 जानेवारीला एकत्रित सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता 13 जानेवारीला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती एम.आर शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती पी. नरसिंह यांच्या घटना पिठापुढेही सुनावणी होणार आहे.