नवी दिल्ली- तब्बल 23 वर्षांपूर्वीच्या बहुचर्चित चार घोटाळ्यातील दोरांडा प्रकरणात राजदचे राष्ट्रीय अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
दोरांडा कोषागारातून अवैधरित्या 139.35 कोटी रुपये काढण्यात आले होते. या प्रकरणी सीबीआयचे विशेष न्यायालय आज शिक्षा सुनावणार असून लालूप्रसाद यांना जामीन मिळणार की तुरुंगात जावे लागणार हे पाहावे लागणार आहे.
चारा घोटाळ्यातील सर्वात मोठ्या प्रकरणात रांची इथल्या विशेष CBI न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने राजेंद्र पांडे, साकेत लाल, दीनानाथ सहाय, राम सेवक साहू, ऐनुल हक, सनौल हक, अनिल कुमार यांची दोरांडा प्रकरणात पुराव्याच्या आधारे निर्दोष मुक्तता केली आहे.
यापूर्वी लालूप्रसाद यांना चारा घोटाळ्याशी संबंधित चार प्रकरणांमध्ये सुमारे 27 वर्षांची शिक्षा झाली होती. यासोबतच त्यांना एक कोटींचा दंडही ठोठावण्यात आला होता. सध्या लालू यादव जामिनावर बाहेर आहेत. चारा घोटाळ्याशी संबंधित यापूर्वीच्या खटल्यांमध्ये लालूंना पाच ते सात वर्षांची शिक्षा झाली होती . त्यानंतर उच्च न्यायालयाकडून दुमका प्रकरणात दिलासा मिळाल्यामुळे लालू सध्या तुरुंगाबाहेर आहेत.
या खटल्यात 7 ऑगस्ट 2021 रोजी फिर्यादी पक्षाच्या वतीने युक्तिवाद पूर्ण झाला , ज्यामध्ये एकूण 575 साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले . तर बचाव पक्षाच्या वतीने 29 जानेवारी रोजी 110 आरोपींचा युक्तिवाद पूर्ण झाला . लालू प्रसाद यांचाही यात समावेश आहे . बचाव पक्षाचे वकील संजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, लालू प्रसाद यांना चारा घोटाळ्याच्या 4 प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. यात चाईबासा कोषागारातून बेकायदेशीर पैसे काढण्याचे दोन प्रकरण आहेत, तर लालू प्रसाद यांना देवघर आणि दुमका कोषागार प्रकरणात जामीन मिळाला आहे.