नवी दिल्ली- अलिबागमधील 19 घरांचा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. बंगले जर ठाकरेंच्या नावे नाहीत तर टॅक्स भरता कशाला ? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी जर लिहून दिलं की असं केलेलं नाही तर मला एक नाही, दोन जोडे मारा. मी माझे जोडे संजय राऊतांना देतो. असे म्हणत किरीट सोमय्या यांनी आपल्या पायातील जोडा हातात घेतला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेला आज किरीट सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. यावेळी त्यांनी अलिबागमधील 19 बंगले ठाकरे यांचेच असल्याचे सांगितले. 2013 ते 2021 या काळात सगळा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. घरं नाही तर घरपट्टी का भरतात ? त्यामुळे संजय राऊत आता जोड्यानं कुणाला मारणार ? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.
रश्मी ठाकरे यांनी 12 नोव्हेंबर 2020 ला टॅक्स भरला, त्यानंतर ती घरे चोरीला गेली का ? त्या संबंधी मी तक्रार केली आहे, त्याची चौकशी करा, घर नाही हे दाखवायचे नाटक कशाला करता असा प्रश्न देखील सोमय्या यांनी संजय राऊत यांना केला.