राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रात वादाची नवीन ठिणगी पडली आहे. दरम्यान संशयास्पद परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाल्यामुळे ही हत्या असल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशी करण्याची देखील घोषणा केली आहे.
या प्रकरणांमध्ये आता मोठा खुलासा समोर आला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर हा पोलीस कोठडीत असून आंबेडकर यानी वारेशे याच्यावरील हल्ला हा पूर्व नियोजित कट असल्याचं मान्य केल आहे. दरम्यान आंबेरकरला मंगळवारी राजापूर न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आंबेरकरला अटक केलेल्या राजापूर पोलिसांनी बुधवारी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या कटामध्ये आणखी काही लोक सहभागी आहेत का ? याचा तपास पोलीस करत आहेत.
या प्रकरणाच्या तपासासाठी 11 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. पोलीस उपाधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली हा तपास होणार आहे.
काय आहे प्रकरण
राजापूर येथे रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वाराशे यांचा अपघात झाला होता. पत्रकार वारीशी यांची , “मुख्यमंत्री शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री फडणवीसजी महोदय, आपल्यासोबत कुणाचे फोटो ? शहानिशा कराच ! ” पंतप्रधान मोदीजींसह राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपीचे फोटो, रिफायनरी विरोधी शेतकऱ्यांचा सनसनाटी आरोप ” अशा मथळ्याखाली महानगरी टाइम्स या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतरच त्यांचा अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ज्या गाडीसोबत त्यांचा अपघात झाला ती गाडी जिल्ह्यातील प्रस्तावित केलेल्या तेल शुद्धीकरण कारखान्याचा समर्थक आंबेरकर याची होती. त्यामुळेच हा मृत्यू नसून घातपात असल्याचा आरोप होत होता.