मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राचं राजकारण प्रचंड ढवळून निघाल आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकरणामुळे ते शांत होण्याचं नाव देखील घेत नाही. हर हर महादेव चित्रपटा बाबत जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला. ठाण्यातील चित्रपटगृहामध्ये सुरू असलेले हर हर महादेव चित्रपटाचे प्रदर्शन देखील त्यांनी बंद पाडलं, आणि त्यानंतर एका प्रेक्षकाला मारहाण देखील झाल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली. त्यानंतर जामीन देखील मिळाला. हा वाद थंड होतो न होतो तोच भाजपच्या एका महिला कार्यकर्त्यांन जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी विरोधकांनी जितेंद्र आव्हाड यांची चांगलीच बाजू लावून धरली आहे. 72 तासांमध्ये दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी आपला राजीनामा देखील सादर केला. परंतु यावर राष्ट्रवादीच्या प्रत्येक पदाधिका-यांनी नाराजीच व्यक्त केली आहे. तर आता थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच फोन लावून ‘राजकीय हेतूने अशा कारवाया टाळाव्यात, अशा कारवाया करणे योग्य नाही. त्यामुळे समाजात वेगळा संदेश जातो आहे.’ असे सुनावले. तर यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही कारवाई कोणत्याही राजकीय हेतूने करण्यात आलेली नसून, एका महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे असे म्हटले असल्याचे समजते. एबीपी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते.