आपण एखाद्या बँकेत खाते सुरू करतो किंवा एखाद्या योजनेत गुंतवणूक करतो तेव्हा त्या अर्जात नॉमिनीचा उल्लेख करण्याचे सांगितले जाते. कारण एखाद्या दुर्देवी घटनेमुळे खातेधारकाचा मृत्यू झाल्यास संबंधित खात्यातील रक्कमेवर नॉमिनीचा अधिकार राहतो. यानुसार नॉमिनी खात्यातील रक्कम काढून घेऊ शकतो. नॉमिनी हा वारसदार असतोच असे नाही. कोणी मित्र असू शकतो, काका असू शकतो, अन्य कोणीही असू शकतो.
भविष्यात आर्थिक गुंतागुंत निर्माण होऊ नये यासाठी नॉमिनी असणे आवश्यक असताना आणि यासंदर्भात बँकेकडून वारंवार सूचना दिली जात असतानाही अनेकदा बहुतांश मंडळी नॉमिनीचे नाव देण्याचा कंटाळा करतात. एखाद्या ठिकाणी नॉमिनीचा उल्लेख नसेल तर पैसे काढण्याचा अधिकार हा कायदेशीर वारसदारास दिला जातो. पण यासाठी त्याला वारसा प्रमाणपत्र सादर करावे लागते. अर्थात ती प्रक्रिया बरीच मोठी आहे.
नॉमिनी आणि वारसदारातील फरक
कायद्यानुसार, नॉमिनी हा कोणत्याही मालमत्तेचा मालक नसतो आणि तो एखाद्या विश्वस्ताप्रमाणे काम करत असतो. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तो खात्यात जमा असलेली रक्कम काढून संबंधिताच्या वारसापर्यंत पोचवत असतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आपण नॉमिनीला केअर टेकर म्हणू शकता. नॉमिनीचा अर्थ म्हणजे खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या खात्यातील रक्कम काढण्याचा अधिकार नॉमिनीला मिळतो. प्रत्यक्षात वारसदार हा मालमत्तेचा खरा मालक असून त्याचा उल्लेख कायदेशीर इच्छापत्रात असतो. किंवा वारस कायद्यानुसार संबंधिताच्या मालमत्तेवर त्याचा हक्क असतो. कोणतीही मालमत्ता किंवा रक्कम असो मालकाच्या मृत्यूनंतर त्यावर अधिकार नॉमिनीचा राहतो. परंतु त्याला ही रक्कम बाळगण्याचा अधिकार नाही. ही रक्कम त्याला वारसदारास सोपवावी लागते. नॉमिनी हा वारसदारापैकी एक असेल ती मालमत्ता किंवा पैशाचा एक हिस्सा मिळवण्यास पात्र असतो.
वारसा प्रमाणपत्राची गरज कशासाठी
आजही भारतात बहुतांश लोक इच्छापत्र करत नाहीत. इच्छापत्रावरून संबंधितास अनामिक भिती वाटत असते. शेवटी इच्छापत्राचा मुद्दा बाजूला पडतो. पण कालांतराने त्यांच्या वारसदारांना मालमत्तेचा अधिकार मिळवण्यासाठी दिवंगत व्यक्तीचे वारसदार असल्याचे सिद्ध करावे लागते. यासाठी त्याला वारसा प्रमाणपत्राची गरज भासते. याकामी न्यायालयातील दीर्घकाळ प्रक्रियेतून जावे लागते.
कसे तयार होते वारसा प्रमाणपत्र ?
ज्या ठिकाणी मृत व्यक्तीची मालमत्ता आहे, त्या ठिकाणच्या दिवाणी न्यायालयात वारसदारास अर्जाचा नमुना दिला जातो. या अर्जात हक्क दाखवू इच्छिणार्या संबंधित मालमत्तेचा उल्लेख केला जातो. शिवाय दिवंगत व्यक्तीची मृत्युची तारीख, वेळ आणि ठिकाण आदींसमवेत मृत्युप्रमाणपत्र जोडावे लागते.
अर्ज दाखल करताच न्यायालयाकडून वर्तमानपत्रात जाहीरात दिली जाते. याशिवाय सर्व पक्षकारांना त्याची प्रत पाठवून आक्षेप मागितले जातात. एखाद्याला आक्षेप असेल तर नोटीस जारी केल्यानंतर 45 दिवसांच्या आत तो आक्षेप नोंदवू शकतो. आक्षेप नोंदवताना त्याला पुरावे सादर करावे लागतात.
या दरम्यान कोणताही आक्षेप आला नाही तर नोटीस जारी केल्यानंतर 45 दिवसांनी न्यायालयाकडून वारसदाराचे प्रमाणपत्र जारी केले जाते. मात्र एखाद्याने आव्हान दिले असेल तर वारसा प्रमाणपत्र जारी होण्यास विलंब होऊ शकतो.