पुणे – बऱ्याचदा रेल्वेने प्रवास करत असताना रात्री उशीरापर्यंत गप्पा मारणे आणि गाणे ऐकणे हे सुरू असते कारण अनेक लोक ग्रुपने प्रवास करत असतात.याचाच त्रास इतर प्रवाश्यांना अधिक होतो. भारतीय रेल्वेकडून रेल्वेमध्ये प्रवास करण्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमांनुसार आता रात्रीच्या वेळेस तुम्हाला असं करता येणार नाही आणि या नव्या नियमांचं उल्लंघन केल्यास तुमच्यावर कडक कारवाई होऊ शकते.
रात्रीच्या वेळी प्रवाशांना झोपेचा त्रास लक्षात घेऊन केलेल्या मोठ्या नियमांची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे महत्त्वाचे आहे.अनेकदा प्रवासी शेजारच्या सीटवर असलेल्या प्रवाशाच्या मोबाईलवर मोठ्याने बोलत असल्याची तक्रार करतात. याशिवाय रात्रीच्या वेळी काही प्रवासी जोरजोरात बोलत असल्याच्याही तक्रारी मोठ्या प्रमाणात केल्या जातात. इतकेच नाहीतर रेल्वे कर्मचारी देखील रात्रीच्या वेळी गप्पा मारत असल्यामुळे झोप खराब होत असल्याच्या तक्रारी प्रवाश्यांकडून वारंवार केल्या जात आहेत. त्यामुळे रात्री उशीरा मोठ्या आवाजामध्ये कोणताही रेल्वे प्रवासी मोबाईलवर बोलू शकत नाही आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकू शकणार नाही.
प्रवाश्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मोठ्या आवाजात फोनवर बोलत असणाऱ्या किंवा गाणे ऐकणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे नियम लागू केले आहेत विशेष म्हणजे रेल्वेमधील प्रवाशांकडून आलेल्या तक्रारीचे निराकरण न झाल्यास रेल्वे कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
जाणून घेऊया नेमके हे नियम काय आहेत-
– कोणत्याही प्रवाश्याला रात्री 10 नंतर मोठ्याने बोलता किंवा मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणे ऐकता येणार नाही.
– रात्रीच्या वेळी प्रवाश्यांची झोप खराब होऊ नये. यासाठी नाईट लाईट सोडून इतर सर्व लाईट बंद राहतील.
– ग्रुपमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत रेल्वेमध्ये गप्पा मारत बसता येणार नाहीत.
– तक्रारीचे निराकरण न झाल्यास रेल्वे कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जाणार.