महाराष्ट्र : राज्य शासनाच्या नोकर भरतीच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता लवकर भरतीच्या मर्यादेत दोन वर्षांची वाढ करण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत वयोमर्यादा वाढीचा निर्णय लागू करण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या विविध विभागात 75 हजार पदांच्या नोकर भरतीची घोषणा सरकारने केली असून नोकर भरतीसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून नोकर भरती होत असते. यंदा स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे राज्य सरकारने 75 हजार पदांची नोकर भरती घोषणा केली आहे.
कोरोनात दोन वर्ष वाया गेली, त्यामुळे स्पर्धा परीक्षा होऊ शकली नाही. यातून अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा उलटून गेली आहे. या विद्यार्थ्यांना संधी मिळावी याच प्रमुख कारणामुळे वयोमर्यादेत वाढ करण्याची मागणी सातत्याने होत होती. ही मागणी मान्य झाली असून वयोमर्यादेत आता दोन वर्षे वाढ करण्यात आली आहे.