मुंबई : मागच्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात टोकाचा वाद सुरु होता. त्यावर आता पडदा पडला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रवी राणा यांनी जवळपास अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर रवी राणा यांनी बच्चू कडू यांची जाहीर माफी मागितली आहे.
बोलण्याच्या ओघात माझ्याकडून काही शब्द गेले. त्यामुळे बच्चू कडू नाराज झाले. त्याचसोबत काही मंत्री, आमदारही नाराज झाले. माझ्या बोलण्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो, असं रवी राणा म्हणालेत.
देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. त्यांचा आदेश आमच्यासाठी महत्वाचा आहे. फडणवीस यांनी अनेक अडचणीच्या प्रसंगातून मार्ग काढत असतात. या प्रसंगातूनही त्यांनी मार्ग काढला. त्यांचा आदेश पाळत मी दुखावलेल्या नेत्याची माफी मागतो, असं रवी राणा म्हणालेत.
बच्चू कडू दुखावले गेल्याने मी त्यांची माफी मागतो. पण त्यांचीही काही विधानं जिव्हारी लागणारी होती. त्यामुळे बच्चू कडू यांनीही आपलं विधान मागे घ्यावं, असं रवी राणा म्हणाले आहेत.