रासायनिक खते खरेदी करत असताना इ पॉस मशीनमध्ये शेतकऱ्यांना आपली जात लिहावी लागत आहे. जात न लिहिता ते मशीन पुढची कार्यवाही करत नाही हा मुद्दा अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांनी चांगलाच उचलून धरला. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारला कळविले आहे असे ते म्हटले, तर खुद्द कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली आहे.
यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, खतं खरेदी करत असताना जातीचा उल्लेख करावा लागतोय. त्याबद्दल मी केंद्रीय कृषिमंत्र्यांशी बोललो आहे. त्याबद्दल लवकरच निर्णय होईल. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला नाही तर मला वाईट वाटतं. त्यामुळे मी शेतकऱ्यांची माफी मागतो. येत्या दहा दिवसात या प्रश्नावर तोडगा निघेल असं देखील सूतोवाच त्यांनी केल आहे.
दरम्यान नाफेडची सध्या 40 केंद्र सुरू असून कांद्याला नाफेडच्या दराप्रमाणे भाव मिळत आहे. हे युक्रेन रशियाच्या युद्धामुळे होतंय. महाराष्ट्र सरकार कांद्याला किती अनुदान द्यायचे याबद्दल विचार करत आहे. पण अधिवेशन संपण्याच्या अगोदर या प्रश्नावर तोडगा काढला जाईल. असे देखील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.