महाराष्ट्र : महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली दहा सदस्यांची आंतरजातीय अंतर धर्मीय विवाह समन्वय समिती गठीत करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. या काळा कायद्याबाबत तीव्र निषेध करतो व कायद्याला समस्त महिलावर्गाने विरोध करावा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केला आहे.
यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई म्हणाले की, जोपर्यंत कोणी तक्रार करत नाही तोपर्यंत असा हस्तक्षेप करणे म्हणजे फॅसिस्ट कृती असून घटनाविरोधी आहे. आंतरजातीय आणि अंतर धर्मीय विवाह जाती निर्मूलनाचा उपाय असल्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करणाऱ्यांना संरक्षण देण्याऐवजी नवऱ्याने फूस लावून पळवले अशा तक्रारी करणाऱ्या आई-वडिलांना मदत करणे हा या समितीचा प्रचंड हेतू असल्याचा स्पष्ट दिसते. स्त्रियांविषयी इतका कळवळा दर्शविणाऱ्यांनी बिल्किस बानूच्या गुन्हेगारांना अटक करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे.