महापुरुषांबाबत अवमान करण्याची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. नवे आदर्श सांगणं हा महापुरुषांचा अपमान कसा काय? असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.नोव्हेंबर महिन्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात बोलताना वादग्रस्त विधान केलं होतं. त्या वादग्रस्त विधानाचा निषेध म्हणून राज्यभर आजही आंदोलन होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवलं आहे.
“माझ्या भाषणातील एक छोटा अंश काढून काही लोकांनी भांडवल केलं. मी म्हणालो की, मी शिकत होतो तेव्हा महात्मा गांधीजी, पंडित नेहरुजी, नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादींना विद्यार्थी आदर्श मानत. हे सारे आदर्श आहेत पण युवापिढी वर्तमान पिढीतील आदर्शसुद्धा शोधत असतेच. त्यामुळंच मी असे म्हणालो की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते अगदी अलिकडच्या काळातील नितीन गडकरी हेही आदर्श असू शकतात. याचाच अर्थ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, होमी भाभा या सुद्धा अनेक कर्तव्यशील व्यक्तींचा युवा पिढीला आदर्श राहू शकतो. आज संपूर्ण जगात भारताचा लौकिक वाढवणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचासुद्धा आदर्श विद्यार्थ्यांसमोर राहू शकतो. याचा अर्थ महापुरुषांचा अवमान करणं असा तर होत नाही. इथं कुठंही तुलना करणं हा विषयच असू शकत नाही.
आता जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे ते केवळ महाराष्ट्राचेच नाहीत तर संपूर्ण देशाचे गौरव आहेत. कोरोनाकाळात जिथं अनेक ‘महनीय’ आपल्या घरातून बाहेर निघत नव्हते तेव्हा मी या वयातसुद्धा शिवनेरी, सिंहगड, रायगड, प्रतापगडासारख्या पवित्र स्थळांवर पायी जाऊन दर्शन घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शूर पुत्राला जन्म देणार्या वंदनीय माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळी सिंदखेडराजा येथेही गेलो. गेल्या 30 वर्षांत त्याठिकाणी जाणारा मी पहिला राज्यपाल असेन. तेथे मी हवाई मार्गानं नाही तर मोटारीनं गेलो. माझ्या कथनाचा मथितार्थच हा होता की, छत्रपती शिवाजी महाराज हे सदासर्वकाळासाठी प्रेरणास्त्रोत आहेत. आदरणीय अमितजी, आपण जाणताच की, 2016 मध्ये जेव्हा आपण हलदानी येथे होतात तेव्हा 2019 पासून कोणतीही निवडणूक लढणार नाही किंवा राजकीय पदांपासून दूर राहीन, अशी माझी इच्छा प्रदर्शित केली होती परंतु माननीय पंतप्रधान आणि आपल्यासारख्यांचा माझ्यावरील स्नेह आणि विश्वास पाहून मी महाराष्ट्रासारख्या महान राज्याचं राज्यपालपद स्वीकारलं.
माझ्याकडून कधी अनावधानानं चूक झालीच तर तात्काळ खेद व्यक्त करणं किंवा क्षमायाचना करण्यास मी कधीच संकोच करत नाही. मुगल काळात साहस, त्याग आणि बलिदानाचं मूर्तिमंत उदाहरण असलेल्या महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंहजी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या वंदनीय महापुरुषांबाबत अपमानाची तर मी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही.
राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना पत्र लिहिलं असलं तरी राज्यपालांना हटवण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आजही बंद, आंदोलनं करत निषेध नोंदवला जातोय. राज्यपालांचं अमित शाहांना पत्र म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण, अशी टीका विरोधकांनी केली आहे.