राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यामागे सध्या सध्या ईडीचा ससेमिरा लागला आहे. मुश्रीफ यांनी अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी मुंबई सेशन्स कोर्टात अर्ज केला होता. कोर्टाने मुश्रीफ यांचा अर्ज फेटाळला आहे.
हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल येथील घरी ईडी अधिकाऱ्यांनी दोन वेळा छापेमारी केली. या छापोमारीतून ईडी अधिकारी त्यांच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन गेल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ईडी अधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण मुश्रीफांनी सुरवातीला चौकशीला जाणं टाळलं होतं. त्याऐवजी त्यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी कोर्टाचे दार ठोठावले. याप्रकरणी कोर्टाने त्यांना काही दिवसांसाठी दिलासा दिला. त्यानंतर हसन मुश्रीफ ईडी चौकशीला सामोरे गेले.
त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या प्रकरणात आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी मुंबई स्तर न्यायालयात अर्ज केला होता. हसन मुश्रीफ यांच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवादही करण्यात आला होता. मुश्रीफांच्या जामीन अर्जावर दोन आठवड्यांपूर्वीच युक्तिवाद पूर्ण झाला होता.
कोर्टाने याबाबतचा निकाल राखीव ठेवला होता. मुश्रीफ यांना जायामिन मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. कोर्टाने ज्या तारखेला निकाल जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं त्यादिवशीही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आज अखेर हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला. आता हसन मुश्रीफ मुंबई हायकोर्टात जातात का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.