पुणे- लाउडस्पीकर खाली आलेच पाहिजेत, पण मग हिंदू उत्सवातल्या स्पीकरचे काय करणार ? असा सवाल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केला आहे. भोंगे उतरवण्याने सर्वाधिक नुकसान हिंदुत्वाचे होईल, असे ते म्हणाले आहेत. दरम्यान राज ठाकरे यांच्या हनुमान चालीसा पठणाबाबत विश्व हिंदू परिषदेने विरोधी भूमिका मांडली आहे.
आनंद दवे म्हणाले की, राज ठाकरे यानी भोंगे उतरवण्यासंबंधीची भूमिका मांडली आहे. भोग्याचा विषय सामाजिक असून मशिदीवरचे आणि सर्वच ठिकाणांवरचे भोगे उतरवलेच पाहिजेत, असे ते म्हणाले होते. एवढेच नाही , तर आधी मशिदीवरचे भोंगे उतरवा नंतर मंदिरावरचे उतरवू अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
या भूमिकेमुळे सर्वाधिक अन्याय हा हिंदूंवर होणार आहे असा दावा दवे यांनी केला आहे. प्रत्येक गावाची जत्रा, उरूस, ग्रामदेवत यात्रा, गणपतीची मिरवणूक यासहित 12 दिवस, नवरात्रीचे दहा दिवस, शिवजयंती, संभाजी महाराज जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, प्रत्येक जातीच्या युगपुरुषांचे दिवस, त्यासंबंधीच्या यात्रा, पाडवा यात्रा, दिवाळी पहाट, दहीहंडी हे सगळेच या निर्णयामुळे संकटात येईल, असे दवे म्हणाले.
रस्त्यावर नमाज पठण चूकच आहे पण मग गणपती मंदिर, मांडव, उत्सव, मांडवातील आरती त्याचबरोबच रस्त्यावरील मिरवणूक, दाडिया यांचे काय करणार असा सवाल आनंद दवे यांनी केला आहे. भोंगे उतरवणे वंदनीय बाळासाहेबांच्या काळात सुद्धा शक्य झाले नव्हते असेही दवे म्हणाले. त्यामुळे या निर्णयाचा फटका हिंदू समाजाला अधिक बसेल असे मत दवे यांनी व्यक्त केले आहे.
हनुमान चालीसा पठाणाला विश्व हिंदू परिषदेचा विरोध
राज ठाकरे हे दुष्प्रचाराचे काम करत आहेत. विश्व हिंदू परिषद ही राजकीय संघटना नाही. कोणत्याही पक्षाशी त्याचा संबंध नाही. त्यामुळे हनुमान चालीसा पठणात विश्व हिंदू परिषद सहभागी होणार नाही असे विहिंप चे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी म्हटले आहे.