मुंबई : जग बदलते आहे तसे तरुणांचे विचार देखील बदलत आहेत. आज अनेक आंतरजातीय आणि अंतरधर्मीय लग्न अगदी सहज होतात. यामुळे समाजातील अंतर कमी होऊन माणसं जवळ येत आहेत. ही गोष्ट जरी खरी असली तरी श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला आहे. लव जिहाद बाबत सरकारने योग्य पावले उचलावीत, नवीन कायदा बनवावा अशी मागणी जोर धरत असतानाच राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. त्यामुळे जर तुम्ही अंतरधर्मीय लग्न करत असाल तर राज्य सरकार थेट मुलीच्या घरी जाऊन याविषयी विचारपूस करणार आहेत.
एखाद्या मुलीने जर अंतरधर्मीय लग्न करण्याचा निर्णय घेतला असेल राज्य सरकार त्या मुलीच्या घरी जाऊन चौकशी करणार आहे. यातून ही मुलगी या लग्नानंतर सुरक्षित राहू शकते का? या दृष्टीने देखील योग्य ती शहानिशा सरकारच करणार आहे. त्यानंतर देखील लग्नानंतर तरुणीला काही त्रास झाला तर तिची मदत देखील सरकार करणार असल्याची माहिती राज्याचे महिला आणि बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.
या निर्णयानंतर नक्की समाजातून काय प्रतिक्रिया उमटतात, या निर्णयाचा नक्की कसा फायदा होतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. यासह हा निर्णय केवळ मुलींबाबतच घेण्यात आला आहे. अर्थात मुलींच्याच घरी जाऊन शहानिशा करण्यात येणार आहे. आंतरधर्मीय लग्न करणाऱ्या मुलांच्या घरी शहानिशा केली जाणार नाहीये. त्यामुळे देखील या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समाज माध्यमातून उमटत आहेत.