पुणे- मुंबईमध्ये 300 आमदारांना म्हाडातर्फे कायमस्वरुपी घरं देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल अधिवेशनात केली. या घोषणेनंतर सर्वच स्तरातून विरोध केला जात आहे. मात्र भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी मात्र मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे स्वागत केले आहे.
मुंबईतील गोरेगाव येथे आमदारांसाठी 300 एचआयजीची घरे (MHADA houses for 300 MLAs in Mumbai) बांधण्यात येणार आहेत. अशी घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे सरकारने केली. मुंबई परिसर वगळता ग्रामीण भागातील आमदारांना ही घरे दिली जाणार आहेत. भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारच्या निर्णयावर टीका होत असतानाच भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
लोकप्रतिनिधींना मुंबई म्हाडामार्फत विकत घरं देण्याच्या निर्णयात काहीच गैर नसल्याचं खासदार गिरीश बापट यांनी म्हटलं आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांसोबत बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
300 आमदारांना फुकटात घरं नाही – जितेंद्र आव्हाड
आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की, आमदारांकडून घराची किंमत वसूल केली जाईल, त्यानंतरच त्यांना घरांचा ताबा मिळणार आहे. जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे. अशी माहिती जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करून दिली आहे.