हनुमान जयंतीच्या महाप्रसादातून सुमारे ५० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नाशिक सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव बाऱ्हे गावात घडली आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान जयंतीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. ७ एप्रिल रोजी सकाळी काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गावकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर अनेकांना उलटी, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास झाला. त्यांनी तातडीने ठाणगाव येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात धाव घेतली.
गावातील आरोग्य केंद्रात जवळपास ७० ते ८० जणांना अन्नातून विषबाधा झाली. यातील काही जणांना प्राथमिक उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे तर काही जणांवर उपचार सुरु आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना तातडीने नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.