|| जय श्रीराम ||
आजकाल माझी खूपच आठवण येतेय तुला… माझा धोसराच घेतलायस तू जणू..! सकाळ-संध्याकाळ, बसता-उठता हल्ली तुझ्या ध्यानी-मनी फक्त मी आणि मीच असतो म्हणे ! परवा तू पुण्यात जाऊन माझी महाआरती केलीस. तू आरती करायला येणार म्हटल्यावर माझ्या मंदिरासमोरील चौकात हू म्हणून गर्दी जमली पण ते सारेच्या सारे तुझे भक्त होते रे ! खास तुला पाहायला आलेले ! एरवी दर शनिवारी माझ्या मंदिरात माझे भक्त म्हणून असे किती जण जमतात रे..? तिथं आपली माझी छोटीशी मूर्ती पण तू आरती करताना सर्वांना दिसावास म्हणून तुला तुझ्या भक्तांनी माझ्यासमोर चक्क चौरंगावर उभं केलं.
…ते ‘राज’भक्त आणि मी फक्त निमित्त !
अंगावर भगवी शाल, कपाळी शेंदरी टिळा आणि हातात आरतीचं ताट घेऊन उभा असलेला तुझा फोटो सर्वत्र प्रसिद्ध झाला पण ज्याची आरती केलीस त्याची मूर्ती एका तरी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याची तुला दिसली का रे ? कशी दिसणार; तेही ‘राज’भक्त आणि मी फक्त निमित्त ! असो, माझा भक्त माझ्यापेक्षा मोठा होतोय याचा मला मनस्वी आनंदच आहे पण आजकाल ‘हनुमान चालीसा’च्या नावाखाली साऱ्या भारतभूमीत जो काही ‘आनंदीआनंद’ सुरू आहे त्याचं काय ? प्रभू श्रीरामांच्या चरणी एरवी लघुरुप धारण करून ‘दासमारुती’ म्हणून लीन असलेला मी; ज्या ज्यावेळी गरज भासली त्यावेळी विशालरूपही धारण केलंच की ! महारुद्र बनून संकटमोचन झालो. विनम्रता आणि शक्ती यांचा मिलाफ म्हणजे मारुती, असं तुम्हीच म्हणता ना रे ? मग माझी ही दोन्ही रुपं नीट न्याहाळून पाहा की रे जरा…
दोन्ही हात जोडून प्रभू श्रीरामांच्या चरणी ‘दासमारुती’ बनून मीच बसून आहे आणि खांद्यावर गदा घेऊन ‘बजरंगबली’ बनून मीच उभा आहे.
‘जय श्रीराम’ काय नि ‘अल्लाहु अकबर’ काय; ‘सबका मालिक एक’ !
आता मुद्द्याचं बोलू… काय चाललंय राज ? अरे, काय पाहातोय मी हे … ‘नासती तुटती चिंता, आनंदे भीमदर्शने’ ही माझी मारुती स्तोत्रातील ओळख पुसण्याचा प्रयत्न केला जातोय ? ‘काळाग्नि, काळरुद्राग्नि, देखता कांपती भये’ असा माझ्या नावाचा दरारा असताना आणि ‘संकटमोचन हनुमान’ म्हणून मला ओळखलं जात असताना माझ्याच नावानं हे भलतं-सलतं संकट उभं केलं जातंय ? ‘जय श्रीराम’ काय नि ‘अल्लाहु अकबर’ काय; ‘सबका मालिक एक’च ना ? मग तुमची अजान तर आमची आरती हा भेदाभेद कशाला ? वाहत्या नद्यांचे मार्ग जरी भिन्न असले तरी त्या जाऊन मिळतात समुद्रालाच ना ?
राज’भक्तांना हाणामारीची नव्हे त्यांना काम देण्याची गरज
राज, तुझ्याकडून वादाची नव्हे संवादाची अपेक्षा आहे. आज तुझ्या ‘राज’भक्तांना हाणामारीची नव्हे तर त्यांच्या हातांना काम देण्याची गरज आहे रे ! तुला ऐकण्यासाठी गर्दी होते हे निर्विवाद सत्य आहे, तुझ्या वक्तृत्वात मोहिनी आहे हेही मान्य पण या गर्दीची माथी घडवण्याची ताकदही तुझ्यात आहे हे तू मान्य का करत नाहीस ? ”राज’शब्द म्हणजे ‘राज’भक्तांसाठी राजाज्ञा असते ना ? मग ठरव ना एकदाचं; मी त्यांना रोजगार देण्यासाठी लढेन, त्यांच्या विकासासाठी झटेन. अरे, एका ‘राज’शब्दाखातर ते जर चौकाचौकात माझ्या नावाचा चालीसा वाचू शकतात तर तू दिलेल्या उत्तम विचारांचं पालन न करतील ते ‘राज’भक्त कसले ?
घे ना त्यासाठी सभा… दे त्यांना उत्तम आचार-विचारांची संजीवनी… आणि मी आहे ना द्रोणागिरी पर्वत उचलून आणायला..! तुला संजीवनी कुठंच कमी पडू देणार नाही… आणि हो, कुठं आहे ती तुझी ब्ल्यू प्रिंट ? पुस्तकांच्या कपाटातून जसा हनुमान चालीसा बाहेर काढलास ना तशी तिलाही बाहेर काढ; झटक तिच्यावरची धूळ आणि मिरव तिला गावागावांत नि शहराशहरांत ! मग बघ कसा घडतो विकास..! हा विकासाचा महामेरू तोलून धरायला या हनुमानाच्या भुजा समर्थ आहेत.
राज, जाता जाता एकच सांगेन… तुझ्या मुखातून विकासाची, एकोप्याची, सलोख्याची भाषा शोभते रे… आणि तीच खरी ‘राज’भाषा असे ! प्रभू श्रीरामांच्या चरणी मी हात जोडून ‘दासमारुती’ बनून आहे मला तसाच राहू दे रे; सर्वत्र शांतता नांदतेय तिला तशीच नांदू दे रे..! या शांततेचा भंग तू होऊ देणार नाहीस इतकंच काय ते तुझ्याकडून हक्काचं मागणं..! नाहीतर नाइलाजास्तव मला जोडलेले हात सोडून ‘बजरंगबली’ व्हावं लागेल आणि गदा फिरवावी लागेल..! प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भारतभूमीत जर अशांततेचं संकट उभं राहिलं तर मात्र हा हनुमान कुणाचीही गय करणार नाही… मग तो हनुमानभक्त असो किंवा..!
|| जय श्रीराम ||
– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी