मुंबई- ६० हजार कोटींच्या चिटफंड घोटाळ्यातील चौकशीनंतर ईडीने कारवाई करत पर्ल ग्रुपची मुंबई आणि पुण्यातील ७५ एकर जमीन जप्त केली आहे. तसेच बँकेतील साडे सात कोटीही ईडीने जप्त केले आहेत.
पर्ल ग्रुपच्या माध्यमातून देशातील विविध राज्यांमधील साडेपाच कोटी गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोप आहे. तब्बल ६० हजार कोटी रुपयांचा हा गुंतवणूक घोटाळा आहे. पर्ल घोटाळ्याचा तपास सीबीआय आणि ईडी करत आहे. दिल्ली, चंदीगड, कोलकाता, भुवनेश्वर यासह अनेक ठिकाणी सीबीआयने छापे टाकून चौकशी केली आहे. याप्रकरणात गेल्यावर्षी २३ डिसेंबर रोजी ११ जणांना अटक करण्यात आली होती. त्यात कमलजीत सिंग याच्यासह चंद्रभूषण ढिल्लो, प्रेम सेठ, मनमोहन कमल महाजन, मोहनलाल सहजपाल आणि कंवलजीत सिंग यांचा समावेश होता. मुख्य आरोपींना साथ दिल्याचा सर्वांवर आरोप आहे.
या तपासात जी माहिती आणि कागदपत्रे पुढे येत आहे त्याच्या आधारे या ग्रुपच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली जात आहे. यानुसार वसई पट्ट्यातील ७५ एकरची जमीन जप्त करण्यात आली आहे. याची किंमत जवळपास १८७ कोटी असल्याची माहिती आहे. तसेच, याचसंदर्भातील बँक खात्यातून साडेसात कोटींची रक्कमही जप्त करण्यात आली आहे.