मुंबई- राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईतील भाजप कार्यालयात जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. ही तर छोटी लढाई होती, अजून मोठी लढाई बाकी आहे, येत्या काळात सरकारला सगळीकडून दणके देऊ असा इशारा फडणवीस यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” राज्यसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयानंतर अनेकांच्या तोंडाचं पाणी पळाले,काही पिसाळले आहेत. या पराभवानंतर मुख्यमंत्र्यानी आता अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. मात्र निवडणुकीतील विजयानंतर आनंद साजरा करायचा असतो, त्यांनी उन्माद करायचा नसतो असेही आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. आपला विजय हा लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित केला पाहिजे. काहीही झाले तरी मतदान करणार या भावनेने ते आले. त्यांच्या मतदानामुळे आमची तिसरी जागा निवडून आली.
“राज्यातील विकास थांबला आहे. आमच्या काळातले सर्व प्रकल्प थांबवून राज्याचं अतोनात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. विमा कंपन्यांना मोठा फायदा होत असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे. किमान दोन कामे राज्य सरकारने दाखवावी असे आव्हानही फडणवीस यांनी दिले.
मी नशीबवान कारण माझं घर मुंबईत नाही
मुंबई मनपात सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून कंगना राणौत, नारायण राणे, मोहित कंबोज, नवनीत राणा यांच्या घरांना नोटीस बजावण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस म्हणाले, केवळ बदल्याची भूमिका घेऊन याचं घर पाड.. त्याचं घर पाड… मी तर नशिबवान आहे माझं मुंबईत घरंच नाहीये. मला नोटीस दिली तर सरकारी बंगल्यालाच मिळेल. नाहीतर मलाही नोटीस आलीच असती. मुंबईत घर नसल्यामुळे आणि नागपुरातील घर तंतोतंत नियमात असल्यामुळे मला नोटीस आलेली नाही. ही पद्धत योग्य नाही. केवळ सरकार चालवण्यासाठी, पदांसाठी सरकार चालवायचं. समाजातील एकाही घटकाचा विचार करायता नाही ही अवस्था आज पहायला मिळते ती अत्यंत खराब आहे.
आता विधान परिषदेवर लक्ष
फडणवीस यांनी आगामी विधान परिषदेसाठी भाजप सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. विधान परिषदेची जागा आपण लढवत आहोत निवडणूक सोपी नसल्याचेही त्यांनी सांगितले. विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेपेक्षाही अधिक लोकांची सदसद्बुद्धि जागृत असेल असा दावा त्यांनी केला.