बीड : अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी आलेल्या 36 वर्षीय मराठा बांधवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विलास पवार (वय 36 रा. गेवराई, जि. बीड) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचं नाव आहे. विलास पवार यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही, मात्र त्यांचा मृत्यू हा उष्मघाताने झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
विलास पवार यांना चालून चालून अतिशय थकवा आला होता. त्यानंतर त्यांना चक्कर येऊ लागल्यानं त्यांना रुग्णवाहिकेतून गेवराई येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र प्रचंड वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका अडकली आणि अंतरवाली सारटीहून गेवराईला येण्यासाठी तब्बल तीन तास लागले. याच दरम्यान त्यांचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला.
विलास पवार यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र पवार यांचा मृत्यू हा उष्मघातानं झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या समजत आहे. विलास पवार यांना चक्कर येत होती. त्याचबरोबर त्यांना प्रचंड उलट्याचा देखील त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणण्यात आले मात्र रुग्णालयात पोहोचण्याअगोदरच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.