पुणे : “राष्ट्र सेवा दल या लोकशाही समाजवादासाठी आग्रही संघटनेत एकाधिकारशाहीचे संकट आलेले आहे. मनमानी कारभाराला प्रश्नांकित करणार्या कार्यकर्त्यांना दडपशाही सोसावी लागत आहे.हा हुकुमशाहीचा कारभार सहन केला जाणार नाही.” असा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत एकबोटे यांनी दिला आहे.
राष्ट्र सेवा दलाचे माजी सहमंत्री विलास किरोते आंदोलकांची भूमिका मांडताना म्हणाले ,” संघटनेच्या घटना दुरुस्तीच्या नावाखाली पूर्ण घटनाच बदलून निर्णय प्रक्रियेचा ताबा घेतला जात आहे. कपिल पाटील यांनी राष्ट्र सेवा दलाचा रिमोट कंट्रोल बनू नये.”
संघटनेच्या संविधानातील बदल आधीच्या घटना धर्मादायला मंजूर होत नाहीत ,तोवर अजिबात करु नका. यामुळे गुंते वाढतच जातील. संघटनेशी संबंधित नसलेले केवळ प्रतिष्ठेसाठी, केवळ मानाचे पद भूषवणारे, कळसुत्री विश्वस्तांची थेट नेमणूक करु नका. पूर्णवेळ कार्यकर्ता धोरणही किमान 10 वर्षे काम केलेल्या अनुभवी पूर्णवेळ कार्यकर्त्यांना विचारुन राबवा. एकाचवेळी अनेक संस्था-संघटनांचे मानधन घेणारे पूर्णवेळ कार्यकर्ते निवृत्त करा.
कोणामुळेही संघटना कोणत्याही राजकिय पक्षाच्या दावणीला बांधले जाणार नाही याची खात्री संघटनेला द्या. याचा एक अर्थ असा आहे कि संघटनेत जिल्हा ते राष्ट्रीय स्तरावर कोणीही राजकीय पक्षातील पदाधिकारी सेवादलाच्या कोणत्याही पदावर नकोत. व्यावसायिक प्रकल्पांच्या नावाखाली सुरु असलेली आर्थिक उधळपट्टी बंद करा.अशा मागण्यांसाठी सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास तिसर्या दिवशी महाराष्ट्रभरातून प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी अरुण थोपटे, विद्याधर ठाकूर, मिहिर थत्ते, वसंत एकबोटे, प्रशांत दांडेकर,विनय र.र., उमाकांत भावसार , वसंत न्हावले, संजय लोणकर, चंद्रकांत शेडगे, नितीन इंदलकर, वसंत जुनवणे,साधना शिंदे,दत्ता पाकिरे, अशोक वरुटे, अलका एकबोटे आणि संजय रेंदाळकर आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.