मुंबई- राज्यसभा निवडणुकीच्या जागेसाठी छत्रपती संभाजीराजे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे यांना पाठिंबा दर्शवला आहे. पण, आता शिवसेना आपला दुसरा उमेदवार देणार आहे, तो निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.
भाजपला रामराम ठोकत स्वतःच्या स्वतंत्र पक्षाची घोषणा करत छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभा निवडणूक लढण्याचे जाहीर केले होते. सोमवारी नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजी राजे यांना पाठींबा देत असल्याचे जाहीर केले. शरद पवार म्हणाले की, आमचा एक उमेदवार निवडून येण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर राहिलेली मत त्यांना देऊ. एवढंच नाहीतर शिवसेना आणि काँग्रेसने सुद्धा संभाजीराजेंना पाठिंबा द्याव, याबद्दल विचारणा करणार असंही शरद पवार म्हणाले होते. यामुळे संभाजीराजे यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
मात्र आज शिवसेनेने वेगळी भूमिका घेऊन राज्यसभेसाठी दुसरा उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. राज्यसभेसाठी शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून येणार आणि तो कसा निवडून आणायचा हे पक्ष बैठक घेऊन ठरवणार आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी पाठिंबा द्यायचा की नाही, याबद्दल पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी सूचक प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांची जून महिन्यात होणार आहे. या निवडणुकीत संख्याबळानुसार भाजपचे २, शिवसेना, राष्ट्रवादी, आणि काँग्रेसचा एक उमेदवार विजयी होईल. सहाव्या जागेवर मला पाठिंबा द्यावा, असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं होतं. संभाजीराजे छत्रपती यांना रायगड जिल्ह्यातील अपक्ष आमदारानं देखील पाठिंबा जाहीर केला आहे.
छत्रपती संभाजीराजेंचा राज्यसभेचा मार्ग बिकट ? राज्यसभेसाठी शिवसेना दुसरा उमेदवार देणार ?
सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपनं लढवल्यास फोडाफोडी करावी लागू शकते.