आगरतळा – चॉकलेट खरेदी करण्यासाठी बेकायदेशीरपणे भारतीय हद्दीत घुसलेल्या बांगलादेशी तरुणाला अटक करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना सांगितले की, तो नियमितपणे सेपाहिजालामध्ये त्याचे आवडते चॉकलेट खरेदी करण्यासाठी तो नेहमी नदी पार करून भारतीय हद्दीत घुसत असे अशी माहिती सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) शुक्रवारी दिली.
इमाम हुसैन असे या तरुणाचे नाव असून तो बांगलादेशातील शालदा नदीच्या काठावर वसलेल्या गावातील रहिवासी आहे. शालदा नदी दोन्ही देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून वाहते. तो नियमितपणे त्रिपुरा राज्यात सेपाहिजालामध्ये त्याच्या आवडत्या चॉकलेट खरेदी करण्यासाठी नदी पार करत असे.
बीएसएफने सांगितले की, हा तरुण सीमारेषेवर सुरक्षेसाठी बनवलेल्या काटेरी तारांच्या कुंपणातून भारतात प्रवेश करायचा आणि कलामचौडा गावातील दुकानात चॉकलेट खरेदी करायला यायचा आणि त्याच मार्गाने परत यायचा. 13 एप्रिल रोजी जेव्हा तो चॉकलेट खरेदी करण्यासाठी आला तेव्हा बीएसएफने त्याला पकडले. सोनमुरा एसडीपीओ बनोज बिप्लव दास यांनी सांगितले की, या तरुणाला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याला न्यायालयात हजर केले. मुलाला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
‘मुलाकडे काहीही बेकायदेशीर आढळले नाही’
दास म्हणाले, “चौकशीदरम्यान असे आढळून आले की हा मुलगा बांगलादेशातील कोमिल्ला जिल्ह्यातील रहिवासी आहे आणि त्याने कबूल केले की तो चॉकलेट खरेदी करण्यासाठी भारतीय हद्दीत प्रवेश करत असे. त्याच्याकडून केवळ 100 बांगलादेशी टका सापडले आहेत, परंतु काहीही बेकायदेशीर आढळले नाही. वैध कागदपत्रांशिवाय भारतीय हद्दीत प्रवेश केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
लष्करी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने आतापर्यंत भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला नाही. बीएसएफच्या सूत्रांनी सांगितले की, “सोनामुरा उपविभागातून जाणारी आंतरराष्ट्रीय सीमा काटेरी तारांचे कुंपण असूनही पूर्णपणे बंद केलेली नाही. कळमचौडा ग्रामपंचायतीत अनेक घरे असून त्या हद्दीच्या या बाजूला बेडरूम तर दुसऱ्या बाजूला ड्रॉईंग रूम आहे. अनेक ठिकाणच्या विषम भौगोलिक परिस्थितीमुळे कुंपण देखील करता आले नाही.
‘बांगलादेशी अनेकदा भारतात प्रवेश करतात’
कलामचौडा येथील रहिवासी इलियास हुसेन म्हणाले, “बांगलादेशी अनेकदा किराणा सामान खरेदी करण्यासाठी किंवा सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी भारतीय सीमेत प्रवेश करतात. बीएसएफ सामान्यतः मानवतावादी कारणास्तव याकडे दुर्लक्ष करते आणि तस्करांवर कारवाई करते. माझ्या माहितीप्रमाणे तो मुलगा फक्त चॉकलेट घ्यायला आला होता.