नव्या संसद भवनाचं उद्घाटन हे केवळ आपल्या नावाच्या पाट्या लागाव्यात म्हणून होत आहे. राजधानी दिल्लीत पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी अनेक इमारतींचं उद्घाटन केलं आहे. त्यावर त्यांचं नाव आहे. म्हणूनच नव्या संसद भवनाच्या पाटीवर आपलं नाव यावं म्हणून हा कार्यक्रम होत आहे. या उदघाटन कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू Draupadi Murmu याना का डावलण्यात आलं ? असा सवाल करत शिवसेना नेते संजय राऊत sanjay Raut यांनी या कार्यक्रमावर शिवसेना बहिष्कार घालत असल्याचे जाहीर केले आहे.
संजय राऊत म्हणाले, “सेंट्रल विस्टा central vista प्रकल्प कोरोना काळात सुद्धा देशाच्या तिजोरीवर लाखो कोटींचा भार देऊन बनवला. त्याची खरच गरज होती का? फक्त पंतप्रधानांची इच्छा आहे म्हणून अर्ध्या दिल्लीवर बुलडोझर फिरवून हा प्रकल्प उभा केला. सध्याच्या दिल्लीतील अनेक इमारतींवर उद्घाटक म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या नावाच्या पाट्या आहेत. फक्त त्या नावाच्या पाट्या उखडून नरेंद्र मोदींचं नाव यावं म्हणून हे काम केलं असेल तर देशाच्या इतिहासातून अशा प्रकारे नावे पुसली जाणार नाहीत.
आदिवासी महिलेला आम्ही देशाच्या राष्ट्रपती बनवल्याचं भाजप सांगत होता. मग या आदिवासी महिला राष्ट्रपतीला संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातून का डावलण्यात आलं? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा तो अधिकार आहे. त्या तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुख आहेत, न्यायव्यवस्थेच्या प्रमुख आहेत. पंतप्रधान आणि राष्ट्रपती हे एकाच कार्यक्रमाला जाऊ शकतात. मात्र त्यांना या कार्यक्रमाला बोलवण्यात आलेलं नाही.
आत्ता जे संसद भवन आहे जिथे आम्ही बसतो ती इमारत आणखी १०० वर्षे टिकणार आहे. तरीही नवी संसद उभारली गेली. अशी टीका संजय राऊत यांनी केली.