मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे आता लवकरच त्यांची तुरुंगातून सुटका होणार असून 100 दिवसानंतर त्यांची सुटका होते आहे.
आज शंभर दिवसानंतर अखेर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला नक्कीच मोठा दिलासा मानला जात आहे. संजय राऊत हे पत्राचा घोटाळा प्रकरणात तुरुंगात होते.
शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्राचा घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने 31 जुलै रोजी अटक केली. आत्तापर्यंत संजय राऊत यांनी जामीनासाठी कोर्टात अनेक वेळा अर्ज केले होते. परंतु त्यांना जामीन मंजूर झाला नाही. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. अखेर कोर्टाने आज त्यांना जामीन मंजूर केल्यामुळे त्यांची सुटका होणार आहे.
आज जामीन अर्जावर सुनावणी होत असताना संजय राऊत यांना जामीन मिळावा यासाठी अनिल देशमुख प्रकरणाचा दाखला देण्यात आला. अनिल देशमुख यांना ज्या पद्धतीने जामीन देण्यात आला आहे. तसाच राऊत यांनाही जामीन देण्याची मागणी करण्यात आली कोर्टाने जामीन मंजूर करून त्यांना दोन लाखाच्या जात मुचलक्यावर सोडण्याचे निर्देश दिले आहेत.
तथापि अद्याप देखील संजय राऊत यांच्यावरील संकट कमी झालेले नाही. इडीकडून राऊत यांच्या जामिनाला विरोध करण्यात येणार असून, जामीन रद्द व्हावा यासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे देखील समजते आहे. दरम्यान जामीन मंजूर झाल्यानंतर शिवसेनेमधून जल्लोष साजरा करण्यात येतो आहे.