मुंबई : राज्यात सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर सर्वच राजकीय पक्ष तीव्र शब्दात विरोध दर्शवत आहेत. सत्ताधार्यांवर आरोप प्रत्यारोप करत असतानाच महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आणि विशेष करून सीमेवरील जनता भरडली जात असताना लवकरात लवकर योग्य निर्णय व्हावा आणि मराठी भाषिकांवरील हल्ले पुन्हा होऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मराठी भाषिकांवरील हल्ले थांबले नाहीत, तर मी स्वतः बेळगावमध्ये जाईन असे म्हटले आहे. तर आज विरोधी पक्ष नेते अजित पवार हे सीमा वादावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला सह्याद्री अतिथी गृहावर दाखल झाले असल्याचे समजते आहे. या भेटीमध्ये प्रामुख्याने सीमा वादावर चर्चा होणार असल्याचे समजते. या भेटीनंतर आता विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका मांडतात या सर्वच हालचालींवर महाराष्ट्राचे लक्ष आहे.