मुंबई – राज्यपालांनी 6 आमदारांची नावे सुचवलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे एकच खबळबळ उडाली. हे पत्र बनावट असल्याचा राजभवनकडून खुलासा करण्यात आला आहे. 12 आमदारांच्या नियुक्त्यांबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या 6 नावांची शिफारस केल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. हे पत्र सप्टेंबर 2020 सालचे असल्याचं या पत्रात लिहिण्यात आले आहे.
राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी 12 नावांची यादी दिली होती. दरम्यान, आज एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामध्ये राज्यपालांकडून 12 पैकी 6 आमदारांची नावे दिल्याचे या म्हटले आहे. वीरभद्रेश करबसप्पा बसवंती (सामाजिक), रमेश बाबूराव कोकाटे (राजकीय), सतीश रामचंद्र घरत (उद्योग), संतोष अशोक नाथ ( सामाजिक), मोरेश्वर महादू भोंडवे (राजकीय), जगन्नाथ शिवाजी पाटील (सामाजिक) यांच्या नावाचा समावेश आहे.
तथापि हे पत्र बनावट असल्याचा खुलासा राजभवनाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या पत्राबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. हे पत्र कोणी सोशल मीडियावर फिरवले. या पत्रामागे कोणाचा हात आहे, आदी सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.
दरम्यान, हे पत्र बनावट असेल तर त्याचीही चौकशी होणं गरजेचं आहे, राज्यपाल भवनातून अशा पद्धतीने बनावट पत्र जातात का?, असा प्रश्नही या निमित्ताने समोर आला आहे. हे पत्र आलं कुठून, कोणी आणलं आणि कोणत्या व्यक्तीने आणलं याचा तपास होण्याची गरज आहे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पत्रावरचा शिक्का आणि सही तपासून त्यात आर्थिक घोटाळे आहेत का, याचं स्पष्टीकरण समोर आलं पाहिजे, असेही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.