औरंगाबाद- औरंगाबाद येथील खुल्ताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेली आहे. औरंगजेब कबर कमिटीच्या मागणीनंतर पुरातत्त्व खात्याने हा निर्णय घेतला आहे.
एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांनी १२ मे रोजी औरंगजेबाच्या कबरीच्या दर्शन घेतल्यानंतर राज्यात प्रचंड वाद निर्माण झाला होता. त्यावर सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाने देखील तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता. छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर जाण्याची गरज काय आहे? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे कंबर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासाठी औरंगजेब कबर कमिटीने यासाठी पुरातत्त्व विभागाकडे मागणी केली होती. त्यानंतर पुरातत्त्व विभागाकडून राज्यातील सद्यस्थिती पाहता औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी पाच दिवस बंद ठेवण्यात आली आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात कशाला पाहिजे असा सवाल मनसेने केल्यावर कबर परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. सध्या औरंगजेबाच्या कबर परिसरात बंदुकधारी पोलिसही तैनात करण्यात आले आहेत.