देशातील १४५ पक्षांमधील सगळ्यात टवाळखोर पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. या टवाळांनी परवा सभा घेतली. महाराष्ट्र विकास आघाडीची म्हणे वज्रमूठ. यांना साधंही कळत नाही की, वज्रमूठ एका ताकदवान माणसाची असते. १६ जण एकत्र मिळून करतात त्याला हात मिळवणी म्हणतात असा टोला भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
आशिष शेलार म्हणाले की, इतके वर्ष आमच्याबरोबर राहून त्यांच्या मनातली इच्छा होती. जे त्यांच्या पोटात होतं ते बोलून चुकले. भाजपाला नामशेष करू असे ठाकरे म्हणाले. भारतीय जनता पार्टीला नामशेष करायचे म्हणजे काय ? त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामशेष करायचे का ? त्यांना अमित शहा यांना नामशेष करायचे आहे का ? त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नामशेष करायचे होते का ? या महाराष्ट्राच्या मातीत औरंगजेब येऊन नामशेष करायची भाषा करत होता. याच महाराष्ट्रात आता कलियुगामध्ये औरंगजेबी स्वप्न उद्धव ठाकरे मांडत आहेत अशी टीका शेलार यांनी केली.
या सगळ्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचे औरंगजेबी हिरवं स्वप्न आहे ते समोर दिसते आहे. त्यांनी हिंदू जन आक्रोश मोर्चावर आक्षेप घेतला. आक्षेप एमआयएम, समाजवादी पार्टीने नाही घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादीने, मनसेने घेतला देखील नाही घेतला. हिंदू जन आक्रोश मोर्चा लव जिहाद आणि लॅंड जिहादच्या विरोधात होता. त्याच्यावर आक्षेप घेण्याचे कारण उद्धव ठाकरे यांनी सांगावे अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.
आम्ही उद्धव ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. उद्धव ठाकरे यांनी मुंबईसाठी काय करणार आहे ते सांगावे. मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले ते सांगावे. राष्ट्रीय पातळीवरील धोरण काय सांगावे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा प्रवास अधोगतीकडे चालला आहे. आता तर तो मुंबईकर आणि मराठी माणसाच्या जीवावर उठला आहे असा गंभीर आरोप शेलारांनी उद्धव ठाकरेंवर केला.