मुळव्याध हा उष्णतेने होणारा आजार आहे. खरं तर हा सामान्य आजार आहे. परंतु काही जणांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. अशा वेळी योग्य वैद्यकीय सल्लाच महत्वाचा आहे. यामध्ये देखील डॉक्टर तुम्हाला औषध उपचार वेळप्रसंगी सर्जरी देखील करण्यास सांगतात. परंतु त्यासह तुमच्या खानपानावर देखील नियंत्रण आणण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातोच.
जर मूळव्याधीचा त्रास हा कधी कधी जाणवत असेल, जसे की काही जणांना शरीरामध्ये उष्णता वाढल्यानंतरच हा त्रास जाणवतो अशांसाठी हा उपाय खूप चांगला आहे.
जर तुम्हाला मूळव्याधीमध्ये रक्त पडणे, शौचास त्रास होणे, गुद्वारापाशी येणारा कोंब हे त्रास जाणवत असतील. तर सर्वात प्रथम मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स, फास्ट फूड, जंक फूड आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चहा-कॉफीवर नियंत्रण आणा. अवेळी होणारी चहा-कॉफी किंवा बद्धकोष्ठता वाढवू शकतील असे अन्नपदार्थ तुम्हाला अधिक त्रास देत असतात.
मसालेदार, तिखट, खारट पदार्थ यामुळे देखील त्रास वाढू शकतो. त्यामुळे शौचास आग होणे जळजळ होणे हे त्रास होतात. मांसाहारामध्ये चिकन आणि अंडी खाणे काही काळासाठी तरी थांबवा.
त्याचबरोबर आहारामध्ये जुने तांदूळ, ज्वारी, गहू, कुळीत, मुग, तूर ही कडधान्य त्याचबरोबर पडवळ, भेंडी, दुधी, तोंडली, वांगी, पालक, घोळ, शेपू, सुरण कंदमूळ या भाज्या अवश्य खा. त्याचबरोबर लिंबू, आवळा, अंजीर, केळी, पिकलेला पेरू, काळी द्राक्षे, डाळिंब ही फळे खा. त्यासह दूध, तूप, लोणी, ताक यांचा देखील आहारातमध्ये समावेश करा. त्यासह जमेल तितक्या वेळा बडीशेप किंवा जिरे घालून पाणी उकळावे आणि हे ग्लासभर पाणी तरी प्यावे.
हे अन्नपदार्थ कोणते खावेत या सर्वांबरोबर योग्य वेळेमध्ये होणारे जेवण हा देखील सर्वच आजारांवर योग्य उपाय आहे. त्यामुळे जेवणाच्या वेळा अवश्य पाळा आणि पाणी योग्य वेळेमध्ये भरपूर प्या.