सणसवाडी (शिरूर) : शिरूर तालुक्यातील सणसवाडी या गावातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. आजच्या काळामध्ये जिथे मुलीला देखील शिकवून स्वतःच्या पायावर उभे करण्याचे स्वप्न पालक पाहत असतात, तिला निडर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात, अशाच आपल्या देशात आजही बालविवाह होत आहेत. दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका सोळा वर्षीय मुलीचे तिच्या आई-वडिलांच्या संमतीनेच लग्न लावून देण्यात आले.
धक्कादायक म्हणजे उद्योजक रवींद्र भुजबळ आणि सणसवाडीच्या माजी सरपंच रोहिणी भुजबळ यांच्या मुलाचा विवाह या मुलीशी लावून देण्यात आला होता. याबाबत एका युवकाने पोलीस अधीक्षक शिक्रापूर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. पोलिसांनी या मुलीच्या वयाचा पुरावा म्हणून विद्यालयातून दाखला मिळवला.
त्यानुसार ग्रामविकास अधिकारी यांनी चौकशी करून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बालविवाहाची तक्रार नोंदवली. त्यानंतर नवरा मुलगा, मुलाची आई रोहिणी भुजबळ, वडील रवींद्र भुजबळ, मुलीचे वडील रामदास ताम्हाणे आणि आई रेश्मा ताम्हाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.