राळेगणसिद्धी- आंदोलन, उपोषणा करून सरकारला जाब विचारणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मागील काही दिवसांपासून शांत बसलेले पाहायला मिळत आहेत. देशात महागाईचा आगडोंब उसळला असताना अण्णा शांत कसे हा प्रश्न करत सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ काशिद यांनी झोपी गेलेल्या अण्णा हजारे यांना उठवण्यासाठी 1 जून रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सोमनाथ काशीद यांनी म्हटले आहे की केंद्र सरकारने निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने पाळली नाहीत. महागाईतही प्रचंड वाढ झाली आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅसची दरवाढ, इंधनासह खाद्यतेलाची होत असलेली दरवाढ, त्यातच खाद्यान्नांची होत असलेली दरवाढ यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. महागाई विरोधात सर्वसामान्यांमध्ये मोठा आक्रोश असून सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. जनता महागाईत होरपळत असताना अण्णा हजारे शांत कसे काय आहेत ? असा सवाल काशीद यांनी केला आहे.
अण्णा हजारे हे झोपले असतील तर त्यांना झोपेतून उठवण्याची आवश्यकता आहे. सामान्यांना मोठा त्रास होत असूनही अण्णा हजारे यांनी एक शब्दही सरकारविरोधात काढला नाही. अण्णा हजारे हे झोपले असतील तर त्यांना झोपेतून उठवण्याची आवश्यकता आहे. अण्णा हजारेंनी जनतेसाठी महागाईविरोधात जनआंदोलन सुरू करण्याची गरज असल्याचे सोमनाथ काशिद यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे वाढत्या वयोमानानुसार, प्रकृतीच्या कारणांमुळे अण्णा हजारे आंदोलन करू शकत नसल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. युपीए-2 च्या कार्यकाळात भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून अण्णा हजारे आणि इतरांनी मोठे आंदोलन उभारले होते. लोकायुक्ताच्या मुद्यावर राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एकतर कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे. लोकायुक्त कायदा बनविण्याचं लेखी आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होतं. मात्र, अडीच वर्षे उलटून देखील त्यावर काहीच झाले नसल्याची खंत अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.