मुंबई- राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला आज मोठा झटका बसला. सध्या तुरुंगात असलेले अनिल देशमुख व नवाब मलिक या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांचा मतदानाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.
राज्यसभा निवडणुकीत मतदानासाठी एका दिवसाचा तात्पुरता जामीन मिळावा, असा अर्ज दोघांनी विशेष पीएमएलए न्यायालयाकडे केला होता. “आम्ही विधानसभा कामकाजात भाग घेण्यासाठी परवानगी मागत नसून केवळ मत टाकण्यासाठी काही तासांकरिता न्यायालयीन कोठडीतून विधानभवनात पोलिस सुरक्षेत पाठवण्याची परवानगी मागत आहोत. आमचा मूलभूत हक्क असल्याचा दावा करून नव्हे, तर मतदारसंघाबाबत असलेले कर्तव्य बजावता यावे या हेतूने कोर्टाच्या विशेषाधिकारात परवानगी मागत आहोत”, असा युक्तिवाद देशमुख आणि मलिक यांच्या वतीने कोर्टात करण्यात आला होता.
या अर्जाला ईडीने विरोध करत 1951 कलम 62(5) या कायद्याचा हवाला दिला. कायद्यानुसार, एखादा व्यक्ती तुरुंगामध्ये असेल तर त्या व्यक्तीला कोणत्याही निवडणुकीत मतदान करता येणार नाही, असे ईडीने न्यायालयाला सांगितले. या कायद्यान्वये कैद्यांना मतदान करण्याचा अधिकार नसल्याची भूमिका ईडीने विशेष न्यायालयापुढे मांडली. आता या निर्णयाच्या विरोधात नवाब मलिक आणि अनिल देशमुख मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अपील करणार आहेत.
अनिल देशमुख यांच्यावर मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल असून, ते गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून तुरुंगात होते. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. नवाब मलिकदेखील अंडरवर्ल्डशी संबंधित आरोपांमुळे कोठडीत आहेत.