राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे काल दुपारी अचानक गायब झाले. सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार नॉट रिचेबल झाल्याने चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता तब्बल १७ तासानंतर अजितदादा पुन्हा प्रकट झाले असल्याने सर्वानी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र एवढे तास दादा होते कुठे या प्रश्नाने सर्वाना भंडावून सोडले आहे.
अजितदादा काल बारामती हॉस्टेवरून निघाले होते. ते दुपारी कोरेगाव पार्कमध्ये आले. त्यानंतर त्यांनी त्यांनी दुपारपर्यंत कात्रज दूध संघातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवादही साधला. जेवण झाल्यानंतर ते केशवनगर येथील त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी रवानाही झाले. त्यांच्या वाहनांचा ताफा नियोजित कार्यक्रमाच्या अलीकडे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर पोहोचला होता. त्यांच्या कारमध्ये ते, त्यांचे स्वीय सहायक आणि चालक असे तिघेच होते. त्यांची कार थांबली, त्या ठिकाणी त्यांनी नारळपाणीही घेतले. फोनवर बोलत असताना त्यांनी अचानक आपले दोन दिवसांचे कार्यक्रम रद्द केले आणि ते पोलिस बंदोबस्त सोडून आपल्या खासगी दौऱ्यावर निघून गेले. नियोजित कार्यक्रमांना शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे; तसेच इतर स्थानिक नेत्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
अजितदादांनी अचानक कार्यक्रम रद्द केले. त्यांचा मोबाईलही लागत नव्हता. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. त्यांच्यासोबत सात आमदार असल्याच्या चर्चाही होत्या. त्यामुळे अजित पवार पुन्हा बंडाच्या तयारीत आहेत की काय अशी चर्चा होती. अखेर १७ तासानंतर अजितदादा दिसले आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत खराडीमध्ये.
अजित पवार हे पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत सकाळी पुण्यातील खराडी भागात आले होते. येथील एका ज्वेलरी शोरूमचं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी शोरूममधील दागिन्यांची पाहणी केली. या दागिन्यांची माहिती घेतली. त्यामुळे अजित पवार हे पुण्यातच असावेत किंवा अजितदादा मुंबईवरून रात्री पुण्यात आले असावेत असंही सांगितलं जात आहे.
यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात अशीच घटना घडली; तेव्हा त्यांनीच खुलासा करून परदेशात असल्याची माहिती दिली होती. याशिवाय २०१९च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी अशाच प्रकारे गायब होऊन, त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामाच थेट विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला होता. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दौरा अर्धवट सोडून ते अज्ञातस्थळी गेल्याने जोरदार चर्चा रंगली होती.