पुणे- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपावरील एसटीच्या कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे. एसटी कामगारांनी कामावर परतावं. जे निलंबित झालेत, ज्यांच्यावर कारवाई केली त्यांना पुन्हा कामावर रुजू करण्याची संधी दिली आहे. 31 मार्च पर्यंत कुणाचं न ऐकता, आत्महत्येचा विचार न करता पुढे यावं आणि एसटीत रुजू व्हावं. तसेच आपलं आपलं काम सुरू करावं. असे अजित पवार म्हणाले आहेत. मात्र त्यानंतर कठोर भूमिका घेतली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
अजित पवार म्हणाले की, एसटीचा प्रश्न सुटलेला आहे. अनिल परब यांनी काल समजूतदारपणे भूमिका घेतली. एसटी कामगारांना त्यांनी शेवटची संधी दिली आहे. एसटी कामगारांना जवळपास सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास नेलं आहे. त्यांची पगारवाढ केली आहे. पूर्वी पेक्षा त्यात साडेसातशे कोटी रुपये वर्षाला वाढ झाली आहे. कामगारांना 10 तारखेपर्यंत पगार देण्याची जबाबादारीही सरकारने घेतली आहे. त्यामुळे कामगारांनी आता कामावर रूजू व्हावं.
एसटीचा संप हाताळण्यात सरकार अपयशी- अनिल परब
तीन महिन्यांहून अधिक काळ उलटूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला नाही. या संपवार तोडगा काढण्यास सरकार अपयशी ठरल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी भर विधान परिषदेत मान्य केलं. परबांनी संप सुरु व्हायच्या आधीपासून ते आतापर्यंतचा पूर्ण घटनाक्रम सांगितला. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांची मान्यता मिळावी या मागणीवर समितीने सर्वांचं ऐकून घेतले. या संपाचे नेतृत्व करणाऱ्या खोत आणि पडळकरांशी बोललो. तेव्हा त्यांनी पगारवाढीची मागणी केली.
आम्ही थेट पगारात पाच हजार वाढवून दिले. ज्यावेळी पगारात एवढी वाढ केली जाते तेव्हा पगार आठ हजारांनी वाढतो. एतिहासात एवढा पगार कधी वाढला नव्हता. तरीही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम राहिले. यांच्या मागणीचा आम्ही अभ्यास करतो होतो. त्यानंतर पगार शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगाराजवळ नेऊन ठेवला. मात्र एवढे प्रयत्न करूनही शासनाला हे संप मिटवण्यात अपयश आले. असे म्हणत परबांनी पूर्ण हकीकत सांगितली.