आंदोलन करण्यासाठी कोण काय आयडिया लढवेल हे काही सांगता येत नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगा येथील अपक्ष सरपंच मंगेश साबळे यांनी देखील अनोखे आंदोलन केले आहे. फुलंब्री पंचायत समितीच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी मंगेश साबळे यांनी नोटा उधळून पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचा निषेध केला आहे.
शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून देण्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी लाच मागतात. सरकार या अधिकाऱ्यांना दीड दीड लाख रुपये पगार देत असूनही यांना विहिरी मंजूर करून घेण्यासाठी गरीब शेतकऱ्याचे पैसे लागतात, असा आरोप या सरपंचाने केलाय. अशा अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आज २ लाख रुपये उधळतोय, हे पैसे घ्या आणि विहिरी द्या. असे म्हणून साबळे यांनी आपल्या गळ्यात बांधलेल्या नोटा उधळल्या.
अजूनही नाही काम झालं तर शेतकऱ्यांकडून आणखी पैसे आणतो , तुम्हाला देतो पण शेतकऱ्यांना विहिरी द्या. असं म्हणत आंदोलन केलं आहे. मी पैसे वाटून निवडून आलेलो नाही. शेतकऱ्यांचं काम करून देण्यासाठी पैसेही वाटू शकत नाहीत, त्यामुळे आज मी अशा प्रकारे व्यथा मांडतोय, अशी भावना या सरपंचाने व्यक्त केली.
पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आम्ही भीक मागू, अजून पैसे आणू तुम्हाला देऊ. मी अपक्ष सरपंच झालेलो आहे. कोणत्या तोंडानं शेतकऱ्यांना पैसे मागून काम करायचं? फक्त एखादा सभापती, आमदाराचं ऐकून पैसेवाल्यांच्या विहिरी करणार असाल तर मायबापहो गरीबाचं काम कोण करणार ? तुम्ही 20-20 लाख रुपये एका वर्षाला घेता, बारवर नाचणारीवर पैसा फेकला जातो, तो बेवारस असतो असं ऐकलंय, पण हा कष्टाचा पैसा आहे, गोरगरीब शेतकऱ्याच्या घामाची किंमत नाही. शेतकऱ्याच्या घरात पोरीचं लग्न आहे….अशी व्यथा सरपंच मंगेश साबळे यांनी मांडली.