बेळगाव : बेळगावच्या हिरेबागवाडी येथे टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांनवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेने हल्ला केला आहे. यावेळी कर्नाटकमध्ये ही वाहने येऊ देणार नाही, यासाठी वाहनांच्या समोर काही संघटनेचे लोक अक्षरशः झोपले तर वाहनांवर दगडफेक देखील करण्यात आली असल्याचे समजते. बऱ्याच दिवसापासून कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद सुरू आहे. पण या हल्ल्यानंतर आता वादाची पहिली ठिणगी पडली आहे.
या हल्ल्यानंतर महाराष्ट्रभर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून ठाकरे गटाने देखील आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर इचलकरंजीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केल आहे. कर्नाटक महाराष्ट्राची गाडी पुढे येऊ देणार नसेल तर कर्नाटकची एकही गाडी महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी भूमिका मनसेने घेतली आहे.
दरम्यान एसटी महामंडळाने देखील जर कर्नाटक प्रशासन किंवा आंदोलन ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाकडून राज्याची सीमा ओलांडू दिली नाही तर महाराष्ट्रातून कर्नाटककडे जाणाऱ्या बस देखील थांबवल्या जातील, एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी हा निर्णय घेतला आहे.
एकंदरीत वाद चिघळत असल्याचे पाहता आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटकचे पोलीस सीमेवर तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान या हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राच्या वाहनांना संरक्षण देणार असल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज मुंबई यांनी दिली आहे.