चांगल्या दिवसानंतर वाईट दिवस आणि पुन्हा वाईट दिवसानंतर चांगला दिवस हे तर आयुष्याचे चक्रच आहे. उगवत्या सूर्याला देखील अस्त असतोच. पण अनेक वेळा घरातील दुःख दारिद्र्य माणसाला प्रचंड मेहनत आणि परिश्रमाशिवाय फळ मिळणार नाही हा परमेश्वराचा नियम तर आहेच , पण परिश्रमासाठी बळ मिळावे यासाठी जरी परमेश्वरासमोर हात जोडून उभे राहिले तरी त्याचे कृपा छत्र मिळतच असते.
बऱ्याच वेळा तुम्हाला अनुभव आला असेल की, आपण एखाद्या मोठ्या संकटातून अगदी सहज निभावलो गेलो आहोत. आपण सहज म्हणूनही जातो की माझे नशीब बलवत्तर म्हणून मी वाचलो… पण याला कारण तुम्ही परमेश्वरासमोर जो काही वेळ मनोभावे व्यक्तित केला आहे , त्या परमेश्वराचाच तो आशीर्वाद असतो. आज तुम्हाला अशाच एका व्रता विषयी माहिती सांगणार आहे. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा लांबच राहावी. कोणतेही व्रतवैकल्य ,पूजाअर्चा या मनाला बल देण्यासाठी असतात. आज मी तुम्हाला वैभव लक्ष्मी व्रता विषयी माहिती सांगणार आहे.
या व्रता विषयी तुम्ही यापूर्वी देखील ऐकलं असेल. अनेक जण हे व्रत करतात देखील. हे व्रत अत्यंत सोपे आहे. जाणून घेऊयात हे व्रत कसे केव्हा करायचे आहे.
हे व्रत सुरू करताना तुम्ही कोणत्याही शुक्रवारी करू शकता. श्री महालक्ष्मीच्या कृपेने घरातील आर्थिक ,आरोग्य, संतती ,मानसिक दारिद्र्य दूर होण्यास मदत मिळते अशी श्रद्धा आहे. हे व्रत कोणीही करू शकते कुमारी का सुवासिनी विधवा किंवा अगदी पुरुषांनी देखील हे व्रत अवश्य करावे.
तुम्ही नोकरदार असो किंवा गृहिणी… आठवड्यातला एक शुक्रवार सायंकाळी केवळ एक तास तुम्हाला या पूजेसाठी लागणार आहे. या पूजेमुळे तुम्हाला मानसिक बळ तर मिळतेच तुमच्या संपूर्ण कुटुंबाला देखील एक सुरक्षेचे छत्र निर्माण करते.
शुक्रवारच्या दिवशी सकाळी सुचिर्भूत झाल्यानंतर देवी लक्ष्मीला आणि घरातील कुलदेवाला नमस्कार करावा. सकाळी देवांची पूजा करून घ्यावी. दिवसभर उपवास करावा. उपवास झेपत नसेल तरीही चालेल केवळ मनामध्ये आजचा दिवस कोणाविषयी वाईट विचार, अपशब्द किंवा घरामध्ये कोणतेही वाद विवाद होणार नाही याची काळजी घ्यावी. मौन बाळगा.
सायंकाळी सहा वाजता पूजेसाठी प्रारंभ केल्यास तिन्ही सांजेपर्यंत महालक्ष्मीची आरती करू शकता. त्यासाठी सर्वप्रथम आपल्या घरातील देवांच्या शेजारीच एका पाटावर पांढरे वस्त्र मांडावे. या पांढऱ्या वस्त्रावर आता स्वच्छ पांढऱ्या तांदळाचा एक गोल बनवून घ्यावा. या तांदळाच्या गोलावर मध्यभागी कुंकवाने स्वस्तिक रेखाटवा. यावर पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे. या कलशावर अष्टभुजांना उभ्या रेषा देऊन हा कलश तांदळाच्या राशीवर ठेवा. या कलशामध्ये एक सुपारी आणि एक रुपयाचे नाणे घालावे.
या कलशावर आता एक ताम्हण ठेवून त्यामध्ये एक छोटी वाटी ठेवा. या वाटीमध्ये तांदूळ घालून त्यात सोन्याचा, चांदीचा दागिना ठेवावा किंवा घरातील महालक्ष्मीची छोटी मूर्ती किंवा अगदी एक रुपयाचे नाणे ठेवले तरीही चालेल. यानंतर उजव्या बाजूला शंख आणि डाव्या बाजूला घंटा ठेवावी. मध्यभागी अक्षता ठेवून त्यावर गणपती स्वरूप मानून सुपारी ठेवावी.
आता सर्वप्रथम श्री गणेशाला हळद-कुंकू वाहून पूजेसाठी सुरुवात करावी. त्यानंतर कलशातील दागिन्याला हळद कुंकू वाहावे. आणि धूप दीप लावावा. या ताम्हनामध्ये श्रीयंत्र देखील ठेवावे. त्यानंतर कोणत्याही पूजा भांडारमध्ये तुम्हाला वैभव लक्ष्मी व्रताचे पुस्तक मिळू शकते. या पुस्तकातील विधीप्रमाणे संतान लक्ष्मी ,वैभव लक्ष्मी ,धान्य लक्ष्मी ,गजलक्ष्मी ,आधीलक्ष्मी, विजयालक्ष्मी, वीरलक्ष्मी, ऐश्वर्यालक्ष्मी या लक्ष्मी मातेच्या रूपांना नमस्कार करून पूजा विधी सुरू करावी.
श्लोक आणि कहाणी वाचल्यानंतर गोडाचा नैवेद्य दाखवावा. यासाठी तुम्ही खीर करू शकता किंवा एका वाटीमध्ये गुळ खोबरे ठेवले तरीही उत्तम… एखाद्या स्त्रीला लक्ष्मी मानून दर शुक्रवारी तिची ओटी भरून आदर सत्कार करू शकता. खिरीचा नैवेद्य करून खीर प्रसाद म्हणून देखील देऊ शकता. त्यानंतर श्री गणेशाची आरती, महालक्ष्मीची आरती, कुलदेवतेची आरती करावी आणि आपल्या मनातील संकल्प लक्ष्मी समोर बोलावा. 7,11 ,21, 51 असा शुक्रवारचा संकल्प बोलून आपल्या इच्छेप्रमाणे जोडप्यांना जेऊ घालावे किंवा दानधर्म करून उद्यापन करावे त्यानंतर उपवास सोडू शकता.