नवी दिल्ली : राज्यातील सत्ता संघर्षावर गेल्या आठ महिन्यांपासून सुनावणी सुरू आहे. आत्तापर्यंत हे प्रकरण व्हेकेशन बेंचकडे देण्यात आलं होतं. त्यानंतर तीन न्यायाधीशांकडे हे प्रकरण होतं. 16 तारखेला झालेल्या सुनावणी नुसार राज्यातील सत्ता संघर्षावर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, जस्टीस एम. आर. शहा, जस्टीस कृष्णमुरारी, जस्टीस हिमा कोहली आणि जस्टिस पीएस नरसिंहा यांच्या घटनापिठासमोर गेल्या आठ दिवसांपासून नियुक्तीवाद सुरू असून आता तीन दिवसांच्या सुनावणीमध्ये नक्की काय घडतं याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टामध्ये आज पासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. हे प्रकरण आता सात न्यायाधीशांच्या घटनापिठाकडे की पाच न्यायाधीशांच्याकडेच ठेवायचं, असा निर्णय देखील आज घेतला जाणार असल्याचं समजत आहे.
ठाकरे गटाने हे प्रकरण सात जणांच्या घटनापिठाकडे सोपवण्याची मागणी केली होती. यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हे प्रकरण लार्जर बेंचकडे पाठवावे का ?असा प्रश्न काल शिंदे गटाच्या वकिलांना केला होता. पण शिंदे गटाच्या वकिलाने यावर काहीच भाष्य केले नाही. त्यामुळे आता हे प्रकरण सात जणांच्या घटना पिठाकडे देण्याचा निर्णय घेतला जाणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.